आपल्या सुपर बिझी "सिटी" लाईफ मधे आपण इतके अडकलेले आहोत की आपल्या शिवायही काही पशुपक्षी आपल्याच सोबत राहतात हे आपण विसरत चाललो आहोत. इवलेसे ते जिव, काँक्रीट च्या जंगलात इकडून तिकडे भटकत असतात. काही जास्तीच्या अपेक्षा नसतात. ना अलिशान घरे हवी असतात ना फिरायला गाड्या ना कॉसमेटीक ना कपडे आणि नाही पैसा. आपल्यात जर काही कॉमन आहे तर भूक आणि झोप.
काही दिवसा पुर्वी मी क्रौफीड मार्केट गेले होते. तिथे नेहेमीच फार गोंडस प्राणी-पक्षी असतात. एकीकडे वाईट ही वाटतं, त्याना पिंजऱ्यात पाहून, पण मग ते कोणाच्या तरी घरी जाऊन छान लाडात राहतील म्हणून स्वताची समजूत करून घेते. त्या दिवशी तिथे पक्षांसाठी Water feeder bottle आणि Bird feeder पाहिल, वाटलं चला ट्राय करून बघूयात.दोन्ही वस्तू घेऊन रात्री घरी आले. आल्यावर आधी बॉटल धुवून पुसून त्यात दाणे आणि पाणी भरून ठेवले. सकाळी उठल्यावर पहिल काम म्हणजे माझ्या खिडकीत, त्या दोन्ही बॉटल ठेवून दिल्या आणि मग काय सुरु झाला वेटिंग गेम… आठ वाजले, नऊ, साडे नऊ, दहा, अकरा … एकही चिमणी आली नाही . मी थोडी निराशच झाले. आपल्या इंन्स्टट लाइफ मधे सगळंच इंन्स्टट हवं असत .
अहो चक्क दोन दिवस जाऊनही एकही चिमणी नाही ??? सगळ्या चिमण्या गायब?? कुठे गेल्या??पक्ष्याची संख्या कमी होत आहे हे ऐकून होते पण आता त्यात चिमण्या पण का … ?? हममम … पेशन्स बेटा पेशन्स … मधेच दोन चिमण्या यायच्या बघायच्या आणि निघून जायच्या , हे काय आणीख ??? तिसरा दिवसही उलटून गेला . चौथा दिवस रविवार होता . सकाळी उशीरा पर्यंत झोपण्याचा दिवस. सकाळी साधारण ८ च्या सुमारास खिडकीतून कसलातरी आवाज येत होता . जाग आली आणि कळल तो चिमण्यांचा चिवचिवाट होता. आमची बाई सुमन लगबगीन मला उठवत हळूच म्हणाली," बेबी खिडकीत बघ पाहुणे आलेत." गेल्या तीन दिवसाच्या वेटिंग गेम मधे सुमन बाईही होत्या. माज्या इतकी ती हि आतुर होती, नविन पाहुण्यांसाठी. हळूच पडदा सारत पाहतो तर काय दोन चिऊताई मस्त गप्पा मारत ब्रेकफास्ट करताहेत. फार बर वाटल . प्रतीक्षा संपली होती.
त्या दिवसापासून मला एक गोष्ट कळली . आपण पशुपक्षांच काहीतरी देण लागतो . ते आपल्या जागेत नाही तर आपण त्यांच्या जागेत राहतो ते हि त्यांच्या परवानगी शिवाय . शहरीकारामुळे त्यांच्या जागा आपण बळकावतो आहोत. मग अशा वेळी त्यांनी कुठे राहायचं ? काय खायचं? माझ्या या छोट्याशा बदलामुळे फार मोठा फरक नसेल पडणार कदाचित पण दोन चार चिमण्यांचे कष्ट तरी हलके होतील . आता रोज सकाळी मोबाईल चा अलार्म नाही तर चिऊताई चे आवाज मला उठवतात. त्याच्या मुळे माझी मॉर्निंग गुड असते . त्यांना माज्या खिडकीत पाहून सकाळी सकाळी एक निरागस समाधान वाटत .चला तर मग.. कुठेतरी नवीन सुरुवात करूयात . मी तर सुरुवात केली.. तुमचं काय ???
Comments
Post a Comment